महाराष्ट्र

लोहारा-उमरग्यातील अतिवृष्टी मदतीसाठी अनिल जगताप यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शासन निर्णयाची लवकरच अपेक्षा

लोहारा (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यातील रखडलेल्या अतिवृष्टी मदतीच्या प्रस्तावाबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांची दुसऱ्यांदा मंत्रालयात भेट घेतली. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने अनिल जगताप यांनी केलेले सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्न आता फळाला येण्याच्या वाटेवर आहेत.

यापूर्वी 25 एप्रिल रोजी अनिल जगताप यांनी मंत्रालयात सहसचिव श्री गायकवाड यांची भेट घेऊन, विभागीय आयुक्त कार्यालयात प्रस्ताव रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर संबंधित प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात 28 ऑक्टोबर 2025 रोजी पाठवण्यात आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जगताप यांनी लगेचच मंत्रालयात धाव घेतली. त्यांनी सदर प्रस्तावाची प्रत स्वतः सहसचिव कैलास गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली.

गायकवाड यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून हा प्रस्ताव तातडीने कार्यवाहीस लावण्याचे निर्देश दिले. तसेच या महिन्याच्या अखेरपर्यंत शासन निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असे त्यांनी जगताप यांना आश्वस्त केले.

गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लोहारा व उमरगा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता. यानंतर 28 फेब्रुवारी आणि 12 मार्च 2025 रोजी शासन निर्णय होऊनही मदत न मिळाल्याने, अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली 29 एप्रिल रोजी लोहारा तहसीलसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शासनाकडून लवकरच निर्णय अपेक्षित असून लोहारा-उमरग्यातील सुमारे 80 हजार शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची शक्यता आहे. कुठलाही पदभार नसताना, बळीराजासाठी अनिल जगताप यांनी केलेल्या प्रयत्नांचे शेतकरी समाजात कौतुक होत आहे. धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा होत असून, हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!