लोहारा (प्रतिनिधी) – लोहारा शहरातील शासकीय धान्य गोदामाच्या शेजारी नगरपंचायतीने उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे धान्य साठवणुकीच्या सुरक्षिततेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्पातून दररोज निर्माण होणारे विषारी वायू, दुर्गंधी आणि जंतूंच्या वाढीमुळे गोदामातील धान्य दूषित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नगरपंचायतीने दीड वर्षांपूर्वी नागरिकांच्या तीव्र विरोधाला न जुमानता हा प्रकल्प शासकीय गोदामाच्या शेजारी सुरू केला. यामुळे गोदाम परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, तेथून येणारा उग्र वास आणि उष्ण हवेमुळे निर्माण होणारे वायू गोदामाच्या आत पोहोचून तांदूळ, गहू आणि इतर धान्याला हानिकारक ठरत आहेत. हेच धान्य सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत नागरिकांपर्यंत पोहोचते.
मुळात हा प्रकल्प मार्डी येथे पाच एकर जागेवर उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी ही जागा बदलून शासकीय गोदामाच्या शेजारी प्रकल्प उभारण्यात आला. या निर्णयाला शहरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. आता या निर्णयामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणाम उद्भवत असून, नगरपंचायतीच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती, शासकीय नियमांचे उल्लंघन, परिसरातील आरोग्य, पाणी व बाजारपेठेवर होणारे परिणाम याची सखोल चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
बिराजदार यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकल्पस्थळी होणारे प्रदूषण, निकषांचे उल्लंघन आणि शासकीय बेफिकिरी यावर तातडीने कारवाई न झाल्यास, येत्या १९ मेपासून लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
नगरपंचायतीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला हा प्रश्न आता अधिक गंभीर बनत असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घेणे अत्यावश्यक आहे.