सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी टिकली पाहिजे : माजी राज्यमंत्री बसवराज पाटील

लोहारा (जि.धाराशिव ) : सहकारी तत्वावरील संस्थामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली. सहकारी संस्थात लोकसहभाग असल्याने सभासदांचा हक्क आणि विश्वास कायम असतो. येणाऱ्या काळातही सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. असे मत माजी मंत्री तथा विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्री.बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ( दि. ३०) कारखाना स्थळावर झाली. त्या वेळी ते बोलत होते. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक बापुराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष सादिकमियाँ काझी,कार्यकारी संचालक एम.बी.अथनी,विठ्ठलराव पाटील, केशवराव पवार,शरणाप्पा पत्रिके, विठ्ठलराव बदोले,राजीव हेबळे,संगमेश्वर घाळे,माणिकराव राठोड, शब्बीर जमादार,शिवलिंग माळी,दिलीप भालेराव,दिलीप पाटील,अँड.संजय बिराजदार, प्रकाश आष्टे,मदन पाटील,धनराज मंगरूळे सचिन पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख कर्मचारी आदींची उपस्थिती होती.तर सुत्रसंचलन राजु पाटील यांनी केले तर आभार संचालक अॅड विरसंगप्पा आळंगे यानी मांडले.