राजकीय

केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ‘स्वास्थ्य संवाद’ या प्रकल्पाचे उद्घाटन

लोहारा : ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ‘स्वास्थ्य संवाद’ या प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक १४ ऑक्टोबर रोजी झाले. या प्रकल्पाच्या अंतर्गत दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना सहाय्य तसेच महिलांमध्ये रक्तक्षय किंवा ॲनेमिया विषयी जागृती असे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. हा प्रकल्प लोहारा तालुक्यातील हराळी, सय्यद हिप्परगा, करवंजी, दक्षिण जेवळी, शिवनगर तांडा आणि उत्तर जेवळी येथील बालाजी नगर आणि लक्ष्मी नगर वस्त्या या ठिकाणी होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी या सर्व ठिकाणच्या आशा कार्यकर्त्या आणि महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून डॉ. निलांगीताई सरदेशपांडे तसेच उमरगा येथील सुविधा हॉस्पिटल च्या सौ.ज्योतीताई सातपुते तसेच दूरस्थ पद्धतीने डॉ. मनालीताई पटेल सहभागी झाल्या होत्या. नीलांगी ताईंनी सांगितले की आरोग्य सेवेच्या बरोबरीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती करणे, योग्य माहिती रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पर्यंत पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहे. ज्योतीताई सातपुते यांनी महिलांना स्वतः च्या आरोग्याची काळजी त्यांनी स्वतः घेणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच मनालीताई यांनी दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. प्रकल्पाची माहिती ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभाग प्रमुख गौरीताई कापरे यांनी सांगितली. या दोन्ही उपक्रमात समन्वयक म्हणून काम करणारे ज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते श्री. सचिन सूर्यवंशी आणि सौ.ज्योती ताई गायकवाड या प्रसंगी उपस्थित होत्या. या प्रकल्पाला अमेरिकेतील डॉ.भाग्यश्रीताई बारलिंगे यांच्या ‘अक्षयभाषा’ या सामाजिक संस्थेकडून मदत मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!