
लोहारा ( जि. धाराशिव ) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सास्तूर जिल्हा परिषद गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. सागरबाई अशोक सावळकर या सध्या गटातील विविध गावांमध्ये संपर्क दौरे करत असून, या दौऱ्यादरम्यान त्यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सौ. सावळकर यांनी सास्तूर गटातील गावे, वाड्या-वस्त्यांना भेटी देत घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. महिलांच्या छोट्या बैठका, ग्रामसभा तसेच वैयक्तिक भेटींच्या माध्यमातून त्या प्रचार करत असून, या भेटीदरम्यान नागरिकांकडून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांबाबत प्रश्न मांडले जात आहेत.
प्रचारादरम्यान महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय असून, ज्येष्ठ नागरिकांनीही संवाद साधत शुभेच्छा दिल्याचे चित्र आहे. मोठ्या जाहीर सभांपेक्षा थेट जनसंपर्कावर भर देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारल्याचे दिसते.




