धाराशिवमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
माझी दिवाळी माझ्या गोतवळ्यात…” — भटक्या-विमुक्त कुटुंबांपर्यंत दिवाळीचा गोडवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लोहाऱ्यात हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम

लोहारा (प्रतिनिधी) / धाराशिव : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, प्रेमाचा आणि ऐक्याचा सण. मात्र समाजाच्या कडेला उभ्या असलेल्या घटकांपर्यंत या प्रकाशाचा उबदार स्पर्श पोहोचविणे, हे खरे दिवाळीचे सार आहे. याच भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोहारा शहरात “माझी दिवाळी माझ्या गोतवळ्यात” हा समाजहिताचा आणि मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार व नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या पुढाकाराने करण्यात आले. लोहारा शहरातील पालावर वास्तव्यास असलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील सुमारे ३० कुटुंबांना दिवाळी फाराळाचे साहित्य व साड्यांचे वाटप करण्यात आले.
“दिवाळीचा आनंद सर्वांसाठी” या भावनेने राबविलेल्या या उपक्रमामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण पसरला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रवीण वीरभद्र स्वामी यांच्या हस्ते फाराळाचे साहित्य व साड्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
आमदार प्रवीण स्वामी यांनी या प्रसंगी सांगितले—
“शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकीचा दीप लावणारा परिवार आहे. ‘माझी दिवाळी माझ्या गोतवळ्यात’ हा उपक्रम हा केवळ फाराळ वाटपाचा नव्हे, तर समाजात आपुलकी, बंधुता आणि संवेदनांचा प्रकाश पसरविण्याचा प्रयत्न आहे. लोहाऱ्यातील शिवसेनेचे हे कार्य खऱ्या अर्थाने दिवाळीचा खरा अर्थ अधोरेखित करणारे आहे.”
ते पुढे म्हणाले,
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नेहमीच समाजातील शेवटच्या घटकासाठी आवाज उठवला आहे. दिवाळीसारख्या सणाचे औचित्य साधून वंचित कुटुंबांपर्यंत आनंद पोहोचविणे, हेच खरे शिवसेनिकपण आहे. मी अशा प्रत्येक जनकल्याणकारी कार्यात स्वतः सहभागी राहीन आणि अशा संवेदनशील उपक्रमांना सदैव पाठिंबा देईन.”




