लोहारा (प्रतिनिधी) — भारताच्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 07 नोव्हेंबर रोजी सार्थशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समिती सदस्य श्री. शंकर जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री. विश्वजित चंदनशिवे, स्कूलचे प्राचार्य श्री. शहाजी जाधव, संचालिका सौ. सविता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा सत्कार पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य शहाजी जाधव यांनी सांगितले की, “वंदे मातरम्” हे गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 1870 साली रचले असून आज त्यास 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने राज्यातील 358 तालुक्यांमध्ये विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून या गीताचे सामूहिक गायन होत आहे, असे त्यांनी सांगितले.
यानंतर चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी विश्वजित चंदनशिवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “वंदे मातरम्” हे गीत सर्वप्रथम 1896 साली रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते. या गीतातील देशभक्तीचा भाव प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनात उतरवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस. मीरा माने यांनी तर आभार प्रदर्शन मिस. वैशाली गोरे यांनी केले. कार्यक्रमाला सिद्धेश्र्वर सूरवसे, रमेश गिराम, प्रज्योत माळवदकर, साक्षी कुंभार, दीपिका देशमुख यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.