धाराशिवमहाराष्ट्र
लोहारा तहसील कार्यालयावर शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी व वाहनचालकांचा मूक मोर्चा

लोहारा (प्रतिनिधी) – आज मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी लोहारा तालुक्यातील शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी व वाहनचालक यांनी विविध मागण्यांसाठी एकत्र येत लोहारा तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
मोर्चेकऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त करत तहसीलदार यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आधार देण्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्यात २०१५ साली लागू झालेला गोवंश हत्या बंदी (सुधारित) कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

मोर्चेकऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
शेतकरी कर्जमाफी करून त्यांना आधार द्यावा.
गोवंश हत्या बंदी कायदा २०१५ तातडीने दुरुस्त/रद्द करावा.
गोरक्षकांच्या नावाखाली होत असलेली जनावरांची वाहतूक अडवणे, लूटमार, मारहाण व हत्या यावर कठोर कारवाई करावी.
राज्यातील गोशाळांची उच्चस्तरीय समितीकडून तपासणी करण्यात यावी.
कुरेशी व व्यापारी समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा.
परवानाधारक जनावरांसाठी प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात अद्यावत कत्तलखाने उपलब्ध करून द्यावेत.
मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे की, गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा प्रश्न तीव्र झाला असून खरेदी-विक्री पूर्णतः ठप्प झाली आहे. तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गुंडांकडून लूटमार, मारहाण, अत्याचार यामुळे व्यापारी समाजासह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीत शासनाने तातडीने उपाययोजना करून समाजातील सलोखा, कायदा व सुव्यवस्था टिकवावी, अशी मागणी करण्यात आली.





