धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रांची गरज तीव्र : अनिल जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनुष्यहानी आणि पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषद सर्कलनिहाय यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव
धाराशिव, दि. ३० मे — पावसाळ्यात गडगडाटी वीज आणि वादळी वाऱ्यामुळे दरवर्षी शेतकरी आणि त्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना, धाराशिव जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकरी अभ्यासक अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा परिषद सर्कलनिहाय वीज अटकाव यंत्र बसवण्याची मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकरी आणि जनावरे मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तरीदेखील सध्या जिल्ह्यात केवळ माडज (ता. उमरगा), मोहा (ता. कळम), आंबेजवळगा (ता. धाराशिव) आणि मसला खुर्द (ता. तुळजापूर) येथेच वीज अटकाव यंत्र बसवले गेले आहेत. मागील पाच वर्षांत एकही नवीन यंत्र बसवण्यात आलेले नाही.
मनुष्यहानी आणि पशुधनाची वाढती संख्या चिंताजनक
2020 पासून आजपर्यंत वीज पडून झालेल्या दुर्घटनांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खालीलप्रमाणे जीवितहानी आणि जनावरांचे नुकसान झालेले आहे:
-
2020 : 3 व्यक्ती मृत, 177 जनावरे मृत
-
2021 : 1 व्यक्ती मृत, 261 जनावरे मृत
-
2022 : 4 व्यक्ती मृत, 127 जनावरे मृत
-
2023 : 4 व्यक्ती मृत, 46 जनावरे मृत
-
2024 : 4 व्यक्ती मृत, 171 जनावरे मृत
-
2025 (मे 21 पर्यंत) : 2 व्यक्ती मृत, 36 जनावरे मृत