हिंजवडीसाठी स्वतंत्र नगरपालिका करा

हिंजवडी : (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावातील ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपालिका करण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता मात्र हिंजवडी आणि परिसरातील इतर गावातील ग्रामस्थांकडून देखील हिंजवडीला नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आयटी पार्क म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीसह माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट न करता या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.झपाट्याने वाढत असलेल्या आयटी परिसरातील गावांचा नियोजनबद्ध विकास व चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरकारने अधिक वेळ न घालवता तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी आयटीयन्ससह परिसरातील स्थानिक नागरिक करत आहेत.
—-
*मूलभूत सुविधा पुरविण्यावर मर्यादा*
वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविण्यात येथील ग्रामपंचायतीवर मोठा ताण येत आहे. या भागात बकलपणा वाढत चालला आहे. त्यामुळे या सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाची मिळून स्वतंत्र नगरपालिका होत असल्याने अनेक दिवसांपासून हिंजवडी आणि परिसरातील इतर गावांच्या समावेशाबाबत किंवा स्वतंत्र आस्तित्वा बाबतचा प्रलंबित प्रश्न आता शिंदे सरकार मार्गी लावेल का असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. ही गावे महापालिकेत न घेता या गावांची मिळून एक स्वतंत्र नगरपालिका करा असाही काहींचा सूर आहे.
हिंजवडी गावाच्या व लगतच्या गावाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामपंचायतीतील नागरिकापर्यंत सर्व मूलभूत सोयी सुविधा पोहोचण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत्या लोकसंख्येमुळे सांडपाणी, कचरा यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. हिंजवडी आयटी पार्कच्या वाहनांमुळे सतत ट्रफिकच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. छोट्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत,लोकसंख्या वाढीमुळे ग्रामपंचायत स्तरावर निधी मिळवण्यासाठी कायदेशीररित्या अनेक अडचणी निर्माण होतात स्वतंत्र नगरपरिषद झाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा निश्चित मिळतील व हिंजवडी, माण, मारुजी, नेरे, जांबे येथे अजून नवीन उद्योक प्रकल्प येवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. यासाठी नगरपालिका होणे आवश्यक आहे.
—
महापालिकेत समावेश होण्यासाठी कही खुशी कही गम
महापालिकेच्या समावेशास येथील काही ग्रामपंचायतीचा विरोध कायम असून, त्यांनी तसा ठराव देखील यापूर्वी केला आहे. तर बकालपणा वाढत असल्याने त्यातील काही ग्रामपंचायतींनी ही गावे महापालिका हद्दीतच घ्यावीत, असा देखील ग्रामसभांमध्ये ठराव मांडला आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांचे घोंगडे तसेच भिजत पडले आहे. मात्र अजून तरी या मागणीला यश आले नाही. त्यावर शिंदे सरकारने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
——
आयटी हब मुळे हिंजवडी, माण, मारुजी, नेरे, जांबे या गावांना वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सर्वच गावामध्ये ग्रामपंचायत असल्याने गावामध्ये विकासकामे करण्यास मर्यादा येतात. हिंजवडी सह परिसरातील सर्वच गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून येथील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. जर या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका झाली तर मोठ्या प्रमाणात विकास होईल.शिवाजी बुचडे, मारुंजी
ज्या प्रमाणे उरुळी देवाची आणि फुरसुंगी साठी शिंदे सरकारने नगरपालिका घोषित केली त्याच प्रमाणे हिंजवडी साठी एक स्वतंत्र नगरपालिका तयार करण्यात यावी याबाबत पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहोत. जनभावना लक्षात घेऊन शिंदे सरकारने लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घेऊन या भागासाठी स्वतंत्र नगरपालिका करावी.
जीवन युवराज साखरे
सरचिटणीस
पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा