धाराशिव

लोहारा-उमरगा तालुक्यातील अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; १६ मे रोजी रस्ता रोकोचा इशारा

लोहारा ( जि. धाराशिव ) :  लोहारा आणि उमरगा तालुक्यातील ८६ कोटी ४६ लाख रुपयांच्या प्रलंबित अतिवृष्टी अनुदानासाठी आज लोहारा तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केले. या आंदोलनाला लोहारा-उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर, शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य बापू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू तोडकरी, शिवसेनेचे अमोल बिराजदार तसेच अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनात बोलताना अनिल जगताप यांनी, “१५ मे पर्यंत आम्ही प्रतीक्षा करू, मात्र त्यानंतर जर शासनाने निर्णय घेतला नाही तर १६ मे रोजी नारंगवाडी चौक, तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करू. पोलिसांच्या लाठ्या-गोळ्याही खाव्या लागल्या तरीही आम्ही आमचे हक्काचे अतिवृष्टी अनुदान मिळेपर्यंत माघार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली.

 

लोहारा-उमरगा तालुक्याचा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यातच शासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु राज्य शासनाने २८ फेब्रुवारी रोजी केवळ काही जिल्ह्यांचेच अनुदान मंजूर केले. या अन्यायाविरोधातच हे आंदोलन उभारण्यात आले असल्याचे नेतेमंडळींनी सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी, “महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला म्हणून सरकार आकसबुद्धीने वागत आहे,” अशी टीका केली. सक्षणा सलगर यांनीही शासनाला आक्रमक शब्दांत जाब विचारला.

 

या आंदोलनात राजू तोडकरी, अमोल बिराजदार, शेखर पाटील, मुकेश कांबळे, युवराज तोडकरी आदींनी समयोचित भाषणे करत शासनाच्या दिरंगाईवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांनी एकजुटीने आवाज उठविल्याने आगामी काळात आंदोलनाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!