दक्षिण जेवळी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकीत 65 टक्के मतदान

जेवळी (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूकीत 65 टक्के मतदान झाले. शाब्दिक आणि किरकोळ चकमक वगळता मतदान शांततेत पार पडले.
लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील दक्षिण जेवळी, रूद्रवाडी, पश्चिम तांडा या ग्रुप ग्रामपंचायतची निवडणुकीचे मतदान रविवारी झाले. जनतेतून सरपंच पदासाठी कस्तुराबाई चिनगुंडे, वनिता पीचे,शानूबाई राठोड याच्यात तिरंगी लढत होत आहे. आज मतदारांनी मतदान करून सरपंच पदाचे भवितव्य मतपेटीत बंद केले. ग्रामपंचायतीच्या अकरा जागेसाठी एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण जेवळी गावातील चार प्रभागातील दोन हजार तीनशे सहा मतदान होते त्यापेकी एक हजार चारशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले. सरपंच पदासह बावीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहेत.
शाब्दिक आणि किरकोळ चकमक वगळता चारही प्रभागात मतदान शांततेत पार पडले. पोलिसांनी या निवडणुकीत मोठा बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार घडला नाही.
ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक आणि पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालय लोहारा येथे होणार असून लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.