स्पर्श तर्फे ९६ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

लोहारा : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र बनवून क्षयरुग्णांना उपचारासोबत सकस आहार मिळावा यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. उस्फुर्तपणे निक्षय मित्र बनून त्यांच्या पोषण आहारासाठी सर्वजण पुढे येऊन सहकार्य करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा उमरगा तालुक्यातील क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी स्पर्शने रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून ९६ रुग्णांना सकस आहार वाटप सुरु केले आहेत. स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथे स्वातंत्र्य दिनी या रुग्णांना दुसऱ्या महिन्याचे किट वाटप करण्यात आले आहे. यामध्ये दरमहा जवळपास ७०० रुपयाचे अन्नधान्य, साबण इ. दिले जाते. यात आटा, डाळी, तेल, साखर, शेंगदाणे, अंगाचे साबण व कपड्याचे साबण इ. साहित्य दरमहा पुढील सहा महिने दिले जाते. समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना टी. बी. मुक्त भारत करण्यासाठी निक्षय मित्र बनून त्यांच्या पोषण आहारासाठी किमान १ व जास्तीत जास्त कितीही रुग्ण दत्तक घेऊन त्यांच्यावर आजार बरा होऊन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफीक अन्सारी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोहारा बी.डी.ओ., तालुका आरोग्य अधिकारी व इतर अधिकारी यांनी पोषण आहारासाठी १-१ क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांना साहाय्य केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांनी तसेच ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरचे प्रकल्प अधिकारी श्री. रमाकांत जोशी यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना पुढे येऊन या समाजकार्यास सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे.
लोहारा उमरगा तालुक्याचा क्षयरोग कार्यालयाचे सुपरवायझर श्री. ज्ञानेश्वर बिराजदार व श्री. नागेश ढगे निक्षय मित्र वाढवण्यासाठी व पोषण आहार किट देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे यासाठी पुढाकार घेऊन काम करत आहेत.