हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन करून मराठवाडा मुक्ती संग्रामास दिला उजाळा..

लोहारा : आज मंगळवारी 17 जानेवारी रोजी लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा या गावात मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा व राष्ट्रिय शाळेच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आले. यावेळी हिप्परग्याचे उपसरपंच श्री विजय लोमटे, अँड. देविदास जाधव, रा.स्व.संघाचे धाराशिव जिल्हा सेवा प्रमुख श्री शहाजी जाधव, जनकल्यान समितीचे शंकर जाधव, लोहारा तालुका सहकार्यवाह मनोज तिगाडे, दत्तात्रय पोतदार, जीवन होनाळकर यांच्या हस्ते स्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी शहाजी जाधव यांनी या अभियानाविषयी माहिती देताना सांगितले की,यावर्षी मराठवाडा मुक्त होवून 75 वर्ष पूर्ण झाल्याने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने मराठवाड्यातील सर्व हुतात्मा स्मारक, स्मृती स्तंभास अभिवादन करून त्यावेळी सहभागी स्थानिक स्वांतत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येत आहे.
त्यानंतर शंकर जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपला देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी देशात 565 संस्थान होती, 150 वर्षानंतर इंग्रजांच्या तावडीतून आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यातील 562 संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाली व काश्मीर, जुनागढ, हैद्राबाद हे 3 संस्थान भारतात सामील व्हायला तयार नव्हती, जनतेच्या उठावानंतर जुनागढ आणि पाकिस्तानच्या त्रासाने काश्मीर संस्थान भारतात सामील झाली परंतु हैदराबादचा निजाम काही केल्या भारतात सामील व्हायला तयार नव्हता,त्यामुळे निजामाच्या जुलम व अत्याचाराने मराठवाड्यातील जनता हैराण झालेली होती, त्या जुलमी व क्रूर निजाम राजवटीला उलथून टाकण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे यांनी हिप्परगा रवा येथील राष्ट्रिय शाळा स्थापन करून इथून मराठवाडा मुक्ती संग्रामाची ठिणगी पेटविली.
या संग्रामामध्ये देविसिंग चव्हाण, हुतात्मा वेदप्रकाश, अनंतराव कुलकर्णी, व्यंकटराव देशमुख, विश्वनाथ होनाळकर, दादाराव भोसले गुरुजी, जनार्दन होर्टिकर, आनंदराव पाटील, बिराजदार, आनंदराव ढगे असे अनेक वीर मुक्ती संग्राम चळवळीत सहभागी होवून आपले योगदान दिले. त्यांननतरही कठीण संघर्षानंतर त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार 13 सप्टेंबर 1948 रोजी निजमाविरुद्ध पोलिस अँक्शन झाली आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला निजामाच्या जुलमातून मुक्त करून स्वंतत्र भारतात विलीन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी गावातील बळीराम जाधव, विठ्ठल होनाळकर, अशोक जाधव, गणेश हिप्परगेकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.