
लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आज असा कार्यक्रम रंगला की विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित पाहुणेही भारावून गेले… कारण प्रसंग होता क्रांतीचे प्रतीक, आदिवासींचे प्रेरणास्थान – भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचा!
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अनुष्का देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. सभागृहात शांतता… आणि एका प्रश्नाची उत्सुकता —
“बिरसा मुंडा कोण? त्यांचा लढा एवढा महान का?”
आणि नेमके याच क्षणी मंचावर उभे राहिले प्रा. यशवंत चंदनशिवे!
त्यांनी बिरसा मुंडांच्या जीवनातील संघर्ष, ब्रिटिशांविरुद्धचा बंड, जंगल-पाणी-जमिनीसाठीचा रणसंग्राम, आणि “उलगुलान” या ऐतिहासिक आंदोलनाचा थरार विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत केला.
सभागृहातील वातावरण क्षणाक्षणाला बदलत होते —
कधी टाळ्यांचा कडकडाट,
कधी प्रेरणेची लहर,
कधी डोळ्यात चमक…
यानंतर सीना केशव सूर्यवंशी आणि किरण चिचोळे या विद्यार्थ्यांनी प्रेरक मनोगते सादर केली. त्यांच्या आवाजात एकच संदेश —
“अत्याचाराला झुकायचं नाही… लढायचं!”



