लोहारा / प्रतिनिधी
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोहारा रोड येथे शुक्रवारी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
यावेळी नायब तहसीलदार नाना मोरे आणि नरसिंह ढवळे यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली सरसगट कर्जमाफी त्वरित अंमलात आणावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, शेतीमालाला हमीभाव न मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे आहे.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, पेरणीपूर्वी बी-बियाणे आणि खते शेतकऱ्यांना दिली जावीत, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची हमी लेखी स्वरूपात मिळावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, नोकरीत आरक्षण, कृषी विभागात आधुनिकता आणि फळबाग योजनांसाठी वाढीव अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली.
कृषीमाल व पूरक वस्तूंची आयात बंद करावी, अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून मंत्रालयावर आक्रोश मोर्चा नेण्यात येईल, असा इशाराही स्वराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात महेश गोरे, तानाजी पाटील, प्रशांत थोरात, बळी गोरे, तुळशीदास पवार, युवराज तोडकरी, शिवाजी लकडे, निशिकांत कांबळे, संजय मुरटे, देविदास बिराजदार, मुरलीधर मोरे, श्रीकृष्ण गंगणे, संजय माने, अरुण मोरे, रंगनाथ तोडकरी, ईश्वर मोरे, प्रभाकर मोरे, राम सूर्यवंशी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे व इतर पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी बंदोबस्ताची चोख व्यवस्था केली होती. आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
Back to top button
error: Content is protected !!