धाराशिव : ऊस वाहतूक वाहने व अपघात प्रतिबंध:
सध्या राज्यात साखर कारखान्याची चिमणी पेटल्यावर ऊस वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, ज्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या अशा वाहनांवर रिफ्लेक्टर व ठळक रेडियम बसवणे अनिवार्य करण्याची मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. कालच तुरोरी येथे कराले दांपत्याचा अपघाती मृत्यू झाला. याआधी शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे मामा, अमोल बिराजदार आणि अन्य सहकारी देखील अशाच अपघाताला सामोरे गेले. अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली.
अतिवृष्टी अनुदान:
धाराशिव जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेले असताना
उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ₹86.46 कोटी अतिवृष्टीचे अनुदान अजूनही प्रस्तावित का असून, ते तत्काळ मंजूर करून वितरीत करावे, अशी मागणी करण्यात आली.
ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप:
महाज्योती संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. 23 सप्टेंबर 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत पारित निर्णयाच्या आधारे या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी, अशी ठाम भूमिका आमदारांनी मांडली.
आमदार प्रवीण स्वामी यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी प्रश्नांमुळे विधानसभेत सरकारचे लक्ष या गंभीर समस्यांकडे वेधले गेले आहे.