मराठा समाजाला आरक्षण देण्याची बौद्ध बांधवाची निवेदनाद्वारे मागणी ; साखळी उपोषणास पाठींबा

लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र राज्यातील मराठा बांधवांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू असून त्याच्या समर्थनात लोहारा शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण चालू असून त्याला उमरगा लोहारा तालुक्यातील बौद्ध बांधवांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला तसेच मराठा आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन बुधवारी १ नोव्हेंबर रोजी उमरगा लोहारा तालुका समस्त बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आला.
लोहारा शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा बांधवांचे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण आंदोलन चालू असून या आंदोलनास उमरगा लोहारा तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने बुधवारी रोजी पाठींबा देण्यात आला. या साखळी उपोषण करीत असून बौद्ध समाज बांधवांचे पाठिंब्याचे पत्र त्यांना यावेळी देण्यात आले. तसेच मराठा आरक्षण देण्यात यावे याबाबतचे निवेदन लोहारा तहसीलदार यांना यावेळी देण्यात आले.
बौद्ध समाज बांधवांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज बांधव आरक्षणाची मागणी करीत आहे, त्याच अनुषंगाने सध्याच्या घडीला राज्यात सर्वच ठिकाणी “मराठा आरक्षणाच्या” मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळणे व त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी राज्यातील व देशातील तमाम मराठा समाज बांधवांकडून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.त्यानुषंगाने राज्यातील विद्यमान परिस्थिती लक्षात घेता, राज्यातील मराठा समाज बांधवांना आरक्षण लागु करावे, या
मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात येत असलेली आरक्षणाची मागणी त्वरीत मंजुर करावी व मराठा बांधवांना योग्य तो न्याय मिळवुन द्यावा त्यानुषंगाने आमच्या भावना शासनास कळविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे,कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, जि.प. माजी सभापती हरिश डावरे, विजय वाघमारे, भालचंद्र लोखंडे, मुकेश सोनकांबळे, सुधाकर गायकवाड, तानाजी माटे, गोळाप्पा कांबळे, कमलाकर सिरसाठ , अण्णाराव कांबळे, काकासाहेब भंडारे, तुकाराम वाकळे, बालाजी माटे, उत्तम भालेराव, तात्याराव कांबळे, शरद मस्के, रब्बानी नळेगावे उपस्थित होते.