संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा आमच्या परिवारातला सदस्य – युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील

लोहारा : संस्थेतील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊ शकतात परंतु त्यांनी कामाच्या माध्यमातून जी प्रतिमा तयार केली आहे. त्यातून ते कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाहीत. जी माणसे चांगला विचार करून सेवाभावीवृत्तीने कार्य करतात आणि सतत कार्यमग्न राहतात. त्यांचे व्यक्तिमत्व इतरांना निश्चितच आदर्शवत असते. माणसांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये असणारे चांगले गुण हे इतरांना निश्चितच दिशादर्शक ठरतात. या संस्थेने शिक्षक म्हणून चांगली माणसे निवडल्याने त्यांचे व संस्थेचा नावलौकिक होत आहे. संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा पाटील परिवारातील सदस्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी केले. प्रतिभा निकेतन विद्यालयात आयोजित नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने प्रतिभा निकेतन विद्यालयाचे सहशिक्षक राहूल गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी मंगळवारी (ता. ४) रोजी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या महानंदा रोडगे होत्या. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रफिक तांबोळी, आंबाजोगाईचे प्रा. डॉ. गौतम गायकवाड, भालचंद्र लोखंडे, विक्रम दासमे, राजू मुल्ला, विष्णु सगर, सत्कारमूर्ती राहूल गायकवाड आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की, या शिक्षण संस्थेत काम करण्याची गायकवाड सरांना मिळालेली संधी आणि सेवानिवृत्तीच्या प्रसंगी अशा व्यक्तीचा सत्कार होणे म्हणजे त्यांच्या जीवनाला एक प्रकारची ऊर्जा मिळणेच होय.याप्रसंगी दिलीप भालेराव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राहूल गायकवाड सरांनी या संस्थेमध्ये जे काम केले आहे. ते काम निश्चितच चांगले असून ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले तरी ते समाजसेवेतून कदापी सेवानिवृत्त होणार नाहीत. यापुढेही त्यांनी अशीच जबाबदारी घेऊन कार्यतत्पर राहावे याकरिता त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, प्रा. डॉ. गौतम गायकवाड, प्रा. डॉ. महेश मोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना राहूल गायकवाड म्हणाले की, संस्थेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापक सुधाकर वडगावे, विवेकानंद परसाळगे, पी.पी. बिराजदार, चंद्रमाप्पा कंटे, आर. व्ही. स्वामी, शिवानंद पाटील, आर. एन. सोनवणे आदीची उपस्थिती होते.