गोरसेनेचा 19 जुनला धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको

लोहारा ( जि. धाराशिव ) : विमुक्त जातीच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मुळ जातीचे बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विविध शासकीय नोकऱ्या व शैक्षणिक जागेवर अतिक्रमण करुन संपूर्ण विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय सुरु केला असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोरबंजारा समाजातील अग्रगण्य संघटना गोरसेना दि.19 जून रोजी दुपारी ११:०० वाजता जळकोट ता. तुळजापूर येथे रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
सविस्तर बातमीनुसार असे की,विमुक्त जातीच्या संवर्गात राजपूत भामटा ही एक जमात असून बिगर मागास राजपूत जातीतील लोक भामटा हे शब्द जातीपुढे लावून रजपूत भामटाचे शैक्षणिक व नोकऱ्यात नुकसान करत आहे. यासंदर्भात गोरसेनेनी दि.22 जुलै 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 300 ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले होते.त्यानंतर दि.11 मे 2022 रोजी याच मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा सुद्धा काढला होता तरीही राजपूत भामटा या जातिच्या नावाने बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी शासकीय नोकऱ्या व शैक्षणिक ठिकाणी घुसखोरी सुरुच ठेवलि आहे याचा प्रतिबंध करण्यासाठी गोरसेनेचे हे आंदोलन वाशिमच्या वसंतराव नाईक चौकात करण्याचे योजले आहे.
दरवर्षी राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन हजारो जागा एम बी बी एस,एम.डी, बि ए एम एस,इंजिनिअरींग प्रदेशामध्ये बिगर मागासांनी लुटलेल्या आहेत. असे असताना शिंदे फडणवीस सरकारने भामटा हा शब्दच काढण्यासाठी हालचाली सुरु केल्याने भविष्यात राजपूत भामटा व विमुक्त जातीचे आरक्षण, पूर्णतः धोक्यात येणार आहे. म्हणून शासनाने सदर शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवू नये ,बिगर मागास नामसाधर्म्य असलेल्या जातिनि गैरफायदा घेऊ नये यासाठीं बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी व असे बोगस प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावे, जातवैधता पडताळणी समितीवर विमुक्त जातीचे प्रतिनिधी घ्यावे,1931 च्या जनगणने प्रमाणे व 1961च्या थाडे कमिशनच्या शिफारशीनुसार ज्या गावात व्हि जे अ प्रवर्गातील मूळ राजपूत भामटा वास्तव्याला होते त्या गावाच्या नावाची जातनिहाय यादी दरवर्षी प्रदर्शित करण्यात यावी, राजपूत भामटा मधील भामटा शब्द वगळू नये आदि मागण्यासाठी गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात येत असून भटक्या विमुक्त जातीच्या हजारो लोकानी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोरसेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले आहे.