नव्या समस्यांची त्सुनामी आली आहे. आम्ही मात्र जूनीच पुराणं घेवून बसलो आहोत.

उस्मानाबाद- लातूर भागात पस्तीशी ओलांडलेल्या अविवाहित तरुणांची संख्या ४० हजाराच्या वर आहे, असं एक सामाजिक कार्यकर्ता मागे मी लिहिलेल्या लेखाबद्दल चर्चा करताना सांगत होता. या ४० हजार तरुणांचे लग्न होण्याची कुठलीही शक्यता येत्या काळात नाही. गावनिहाय सर्वेक्षण केले तर हा आकडा अजून मोठा होवू शकतो. ही ४० हजार तरुण पोरं निर्वंश होणार आहेत, हे किती धक्कादायक आहे. पुनुरुत्पादन करणे, वंशसातत्य ठेवणे ही प्रत्येक प्राण्याची नैसर्गिक भूक असते. पण ही अविवाहित मुलं त्यांच्या नैसर्गिक हक्कांपासून वंचित राहणार आहेत. बेरोजगारी, लग्न न होणे, त्यातून वैफल्य येणे, पुढे व्यसनाधीनता आणि मग अकाली मृत्यू अशा मार्गाने गावोगावचे कित्येक तरुण आपले जीवन गमावत आहेत. पण व्यवस्थेला या गंभीर सामाजिक समस्येचे काहीही पडलेले नाही. पुढाऱ्यांची फक्त सत्तेच्या तुकड्यांसाठी कुत्तरओढ चालू आहे.

गावं भयान झाली आहेत. शिकली, सवरलेली शहाणी पोरं शहराकडे गेली आहेत. ग्रामीण भागातून शहरांकडे होत असलेले स्थलांतरण प्रचंड वाढले आहे. गावात उरल्या-सुरल्या टोळक्यांना प्रत्येक नेत्याने विभागून, वाटून घेतले आहे. सत्तेच्या उतरंडीत त्यांना एका ठराविक पातळीवर ठेवले जाते. वरची सर्व सत्ताकेंद्रं ही ठराविक घराण्यांच्या हाती आहेत. तिकडे शहरात गेलेली तरुण पिढी नोकरी, लग्न, फ्लॅट, गाडी, लेकरं, फ्लॅट-गाडीचे हाफ्ते, लेकरांच्या शाळांचा खर्च आणि ‘विकेंड पार्ट्या’ यातच बेजार आहेत. शहरात कौटुंबिक कलह वाढले आहेत. मागच्या दहा वर्षात कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट, पोटगीचे दावे अशा प्रकरणांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. एकंदर ज्याला आपण सुखी, आनंदी जीवन म्हणतो ते स्वप्नवत ठरत आहे. ग्रामीण आणि शहरी भाग अशा सामाजिक, आर्थिक आणि मानसिक संघर्षातून जात आहे. मोजक्या लोकांनी सत्तेच्या खुर्च्या आपल्या बुडाखाली दाबून ठेवून मनमानी कारभार चालवला आहे. सत्तेत बसलेल्यांचा सामान्य माणसाच्या जगण्यातील संघर्षाशी काहीही संबंध उरलेला नाहीये.

आपल्या देशाची लोकसंख्या १५० कोटीच्या घरात गेली आहे. आपले संविधान प्रस्तावनेतच प्रत्येकाला समान संधी मिळवून देण्याची ग्वाही देते. समान संधी तर सोडाच पण या १५० कोटी लोकांपैकी किती लोक चांगले जीवनमान जगतात, हाही संशोधनाचा विषय आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक प्रचंड मानसिक संघर्षातून गुजरत आहे. भौतिक प्रगती, विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने झाला पण या गतीला आपल्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक स्तराने पकडले पाहिजे नाहीतर गंभीर समस्या निर्माण होतात. त्या आता झाल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे लक्ष न दिल्याने या समस्या विकृतीकडे झुकल्या आहेत. त्यातून अनैसर्गिक शारिरीक संबंध, विवाहबाह्य संबंध, वेगवेगळ्या प्रकारचे नशापान, बेजबाबदारपणा, स्वत:वरचे व कुटुंबावरचे नियंत्रण सुटल्याने बिघडलेले ताळतंत्र अशा अनेक समस्यांना आमचे लोक बळी पडत आहेत.

नव्याने निर्माण झालेल्या या सामाजिक समस्यांना बेदखल करुन नेते मंडळी भोंगे, सोंगे, धार्मिक अस्मिता, जातीय अस्मिता, व्यक्तिगत टीका-टिपण्या, खोकेबाजी, सत्ता कोसळवणे आणि बळकावणे अशा प्रकारांत व्यस्त आहेत. नव्या समस्यांची त्सुनामी जवळ आलेली दिसत असताना त्यावर मात करण्यासाठी आमच्या व्यवस्थेतील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दोष दूर करुन प्रत्येकाला जगणे महत्वाचे वाटावे, स्वत:च्या व इतरांच्या जगण्यावर प्रेम व्हावे, स्वत:च्या व इतरांच्या हक्क-अधिकारांप्रती सतर्कता निर्माण व्हावी यासाठी कुठेही धोरणात्मक आणि रचनात्मक काम होताना दिसत नाहीये.

या सगळ्या अंधकारमय आणि दिशाहीन वातावरणाने देशातील पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती आपला ‘अलार्म’ खणकावून वाजवत आहे. पण राज्यकर्त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे आणि जनता इतर सगळ्या गोंगाटात भान हरवून बसली आहे. नव्या समस्यांची त्सुनामी आलेली असताना आम्ही जुनीच पुराणं घेवून बसलो आहोत. हे कुठवर चालणार आहे, हे सगळे आम्हाला कुठे नेवून ठेवणार आहे आणि आम्ही या त्सुनामीतून वाचण्यासाठी काय करणात आहोत यावर गांभीर्याने विचार आणि कृती करण्याची वेळ आली आहे.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!