उन्हाळी सोयाबीन जोमदार

किल्लारी / प्रशांत नेटके
सोयाबिन पिकाची पेरणी साधारणत: जून-जुलै या महिन्यात केली जाते आणि ऑक्टोबर अखेर सोयाबिनची काढणी प्रक्रिया राबविण्यात येते. असे असताना तपसे चिंचोली (ता.औसा ) येथील प्रगतशील शेतकरी रमेश बाळासाहेब बिराजदार यांनी मात्र प्रयोगशिलतेचे आगळेवेगळे उदाहरण समोर ठेवत चक्क डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सोयाबीनची पेरणी केली. विशेष म्हणजे योग्य नियोजनामुळे सद्या हे पीक चांगलेच बहरले असून परिसरात हा विषय कुतूहलाचा ठरला आहे.
शेतकरी रमेश बिराजदार हे सुरुवातीपासूनच शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वी पणे राबवून उत्पन्न वाढीत कशी भर पडेल याकडे लक्ष वेधून शेती करतात.त्यांचे नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरत आहेत.
सोयाबिन हे लातूर जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असून औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथेही सर्वच शेतकऱ्यांकडून सोयाबिनची पेरणी केली जाते. दरम्यान, शेतकरी रमेश बिराजदार यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी सोयाबिन पेरणी केली आहे , त्याचे कारण की खरीप (पावसाळी) सोयाबीनला गोगलगाय प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढला होता, परत वाढत्या येलो मोझॅक च्या प्रादुर्भावाने लागण कमी होत आहे. आणि उत्पन्नात घट झाली होती. उन्हाळी सोयाबीनचे वैशिष्ट्य म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न दुप्पट. उन्हाळी सोयाबीनला कीड अळीचा प्रादुर्भाव कमी असल्याने सोयाबीन जोमदार अवस्थेत आल्याचे पहावयास मिळत आहे. सद्या सोयाबिनचे पीक शेंगाच्या अवस्थेत असून उन्हाळी सोयाबिन पाहण्यासाठी त्यांच्या शेतात इतर शेतकरी आवर्जून हजेरी लावत आहेत. आता एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानात सोयाबिनपासून जवळपास 10-12 क्विंटल उत्पन्न हाती पडेल ,असे शेतकरी बिराजदार यांनी सांगितले.
पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळी सोयाबीन नक्कीच फायदेशीर
उन्हाळी सोयाबीन भलेही पाणी जास्त लागत असो ,पण रोगराईचा प्रादुर्भाव कमी आणि फवारणी खर्च कमी,आणि उत्पन्न दुप्पट मिळते त्यामुळे उन्हाळी सोयाबीन नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि फायदेशीर ठरू शकते. अशी माहिती शेतकरी रमेश बिराजदार यांनी बोलताना दिली.