कृषी संस्कृती मध्ये शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची वेळ आमवस्या

औसा – प्रतिनिधी
वेळ अमावस्या हा खरोखरच आनंददायी व ग्रामीण भागाशी निगडित शेती व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण रब्बीचे आलेले भरघोस पीक, तोडणीला आलेला ऊस या सगळ्याच्या सहवासात एक आनंदाचा दिवस मृग नक्षत्रातील खरिप पेरणी पासून सातवी आमवस्या म्हणजे वेळ आमवस्या या अनुषंगाने आज हि लातूर जिल्ह्य़ात शिवार पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे.पांडवाच्या वनवासातील अधिवासातील तसेच कृषी संस्कृतीशी असलेले सप्तसिंधू चे नात लक्षात घेऊन वेळ अमावस्या चे पूजन केले जाते. या पूजावेळी नारळ फोडून नैवेद्य दाखवून रब्बीचे आलेले भरघोस पीक या आनंददायी वातावरण रमण्याचा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण आहे.
आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने परिसरातील पाण्याचे स्रोत तुडुंब भरले आहेत. बहुतांश ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची हिरवळ असल्याने सध्या या सणादिवशी बाजरीच्या पिठाचे उकडलेले उंडे, भज्जी, अंबील, खिर, आंबट भात व बाजरीच्या भाकरी या मेजवानीचे महत्त्व वाढल्याने शहरातील लोक या सणासाठी गावात येतात.नैसर्गिक संकट कितीही आले तरी काळ्या आईची (लक्ष्मीची) पूजा करण्याच्या परंपरेत शेतकऱ्यांनी कधीही खंड पडू देत नाही .शेतकरी वेळ आमवस्याला शेतात पांडवांची पुजा बांधतो पांडवांना कडब्याच्या पैंजा लावून पांढरा रंग दिला जातो. त्यानंतर पुढे केळीच्या पानावर उंडे, भज्जी, आंबील, खीर, बाजरीची भाकरी, आंबट भात याचा नेवैद्य दाखवला जातो.घरातील बुजूर्ग शेतकरी आपल्या डोक्यावर अंबिलाचे गाडगे घेत पायी जातात शिवारात विधिवत पाचपांढव, लक्ष्मी, शिवारातील देव-देवतांची पूजा केल्यानंतर फडातील पिकांची पूजा व पिकात फिरुन अंबिल, उंडे शिंपडण्यात येते . या नंतर नातेवाईक, मित्र परिवारासह वनभोजनाचा आनंद घेतला जातो . सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन ‘हेंडगा’ घेऊन शेताला प्रदक्षिणा घालतात. यावेळी हार- हार महादेव, बळीराजाचा चांगभलचा जयघोष करण्यात येतो. या सणाला या काही वर्षांपासून अन्यन साधारण महत्त्व आले असून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ग्रामीण खादी संस्कृतीचे महत्त्व या सणामुळे वाढत आहे.
_________________________
त्या साडेसात गावात आजही साजरी होत नाही वेळा अमावस्या…
निजाम राजवटीत औसा तालुक्यातील उजनी, अर्ध आशीव तसेच सिमेलगतच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कानेगाव, नागूर, खेड, कास्ती (बु), कास्ती (खु) व भातागळी या गावातील लोकांना निजाम सैन्यानी वेळा अमावस्या च्या पहिल्या दिवशी अटक करून? तुरूंगात टाकले होते. त्यामुळे वेळा अमावस्या ला घरातील पुरुषमंडळी नसल्याने या साडेसात गावात यादिवशी हा सण साजरा झाला नाही. निजाम सैन्याकडून या लोकांची मकरसंक्रांतीच्या दिवशी सुटका झाली. तेव्हापासून हा सण या साडेसात गावात मकरसंक्रांतीला साजरा करण्याची प्रथा पडली ती आजही कायम आहे.