धाराशिव
मरावे परी किर्ती रूपे उरावे ; बब्रूवान ( आमदार )

मरावे परी किर्ती रूपे उरावे या उक्ती प्रमाणे लोहारा तालुक्यातील भातागळी येथील बब्रूवान रघुनाथ समदळे यांनी आपली किर्ती मागे ठेवून ईहलोकी प्रवास केला. दररोज मजूरी करून उदरनिर्वाह चालवणारा सामान्य माणूसही मनाने अफाट श्रीमंत व दयाळू होता. सामाजिक बांधिलकी जपणारा एक कर्मयोगी होता. सार्वजनिक कार्यक्रम असो की कुणाच्या सुखदुःखाचा प्रसंग असो सेवेसाठी तत्पर हजर राहुन निषःकाम सेवाकार्य पूर्ण करणारा आधुनिक काळातील जणू गाडगेबाबाच. संत मारूती महाराजांच्या सात्त्विक विचारांचा वारसा घेऊन व शंभो महादेवीची कावड डोक्यावर घेऊन शिखर शिंगणापूरची पायी वारी करणारा हा देवमाणुस दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भातागळीकरांना सोडून गेला.
भातागळी आणि परिसरात त्यांना “आमदार “या टोपणनावाने ओळखले जायचे. जनसेवेच्या माध्यमातून आमदारकी मिळविलेल्या या महान विभूतीस विनंम्र अभिवादन. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली आसा परिवार आहे. अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,वारकरी संप्रदाय, व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
बब्रूवान यांच्याबद्दल समाज बांधवांच्या प्रतिक्रिया.
अरेरे अतिशय दुःखद बातमी भातागळीच्या काठीवर निस्सिम प्रेम असणारे सर्वांची मनोभावे सेवा करणारे आणि वारीच्या वाटेवरील सर्वांना परिचित असणारे आणि सर्वांना हवेहवेसे असणारे एक लाडके व्यक्तिमत्व आज आम्ही गमावलं, माझे आणि माझ्या परिवाराचे वैयक्तिक फार मोठे नुकसान झाले अशी माझी भावना आहे. आसबे परिवाराच्या वतीने आणि पायी वारीच्या वाटेवरील सर्व भक्तांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली