लातूर – गुलबर्गा महामार्गावर किल्लारी येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन

किल्लारी / प्रशांत नेटके : किल्लारी तालुक्यासाठी तन-मन धनाने प्रयत्न करीत आहोत. सर्व ग्रामपंचायत पासून सर्वांचे ठराव झाले आहेत. आता फक्त विधानसभेमध्ये ठराव होणे बाकी आहे. यासाठी वेळप्रसंगी भगतसिंगाची भुमिका स्वीकारू याकामी कोणत्याही आंदोलनासाठी मी तयार असल्याची भुमिका दिल्ली किसान आंदोलनाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी मांडले.
गेल्या ४० वर्षापासूनच्या तालुक्याच्या मागणीसाठी केवळ आश्वासने मिळत असल्याने आज बुधवारी ( ता. २१ ) तीन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या किल्लारी व परिसरातील ग्रामस्थांनी सहाव्यांदा लातूर गुलबर्गा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून विधानसभेत ठराव पास करण्यासाठी निवेदन सादर केले.
त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आंदोलक म्हणाले; आता फक्त सरकारच्या इच्छाशक्तीची गरज
किल्लारी हे तीन तालुक्याच्या सीमेवरील गाव असल्याने या परिसरातील नागरिकांना आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. येथे तालुका झाल्यानंतर शासनाच्या कामाचा तणाव कमी होणार आहे. तालुका निर्मितीसाठी लागणारी जागा, बाजारपेठ, अनेक गावांचा संपर्क, विविध शासकीय निमशासकीय कार्यालये अशा सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता फक्त सरकारच्या इच्छाशक्तीची कमी आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किल्लारी तालुका केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. यापुढील आंदोलने बाजारपेठ बंद न ठेवता कुटुंबासह रस्त्यावर उतरुन होतील. याची शासनाने दखल घ्यावी. येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीपर्यंत तालुका नाही झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू व किल्लारीला या कामी सहकार्य करणाऱ्याला पुढे निवडून देऊ अशा भावना व्यक्त करत आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारीसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवावा अशी विनंती आंदोलकांनी यावेळी केली.

यावेळी प्रभारी सरपंच युवराज गायकवाड, महाराष्ट्र कृषी बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, किशोर जाधव, माजी सरपंच गुंडाप्पा बिराजदार, निवृत्ती भोसले, किरण बाबळसुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सुभाष पवार, जयपाल भोसले, वाघंबर कांबळे, गोविंद भोसले, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, भूकंपग्रस्त कृती समिती अध्यक्ष अमर बिराजदार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, नानाराव भोसले, संकट पाटील, महादेव पाटील, प्रकाश मिरगे, अनिल स्वामी, राष्ट्रवादीचे पाशा शेखसह सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संतोष सोमवंशी यांनी किल्लारी तालुका होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी फोनवरून सांगितले की काही कामानिमित्त येऊ शकत नाही. मी येण्याचा हट्ट न धरता प्रतिनिधी पाठवत आहे. त्यांच्याकडे निवेदन सुपूर्द करावे. तुमची तालुका मागणीची आंदोलनाची माहिती तात्काळ वरिष्ठांकडे पाठवतो. असा फोनवरून शब्द दिल्याने आंदोलनाकाकडून विभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले.  यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी, विभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती. आंदोलन स्थळी आंदोलन दोन तास १० मिनिटं चालले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!