मराठा आरक्षण संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा

सारथी संस्थेमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची व्याप्ती वाढवावी, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतीगृह उभारावे
लोहारा ( जि.धाराशिव ) : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दि.२५ रोजी मा.खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून पत्राद्वारे केली आहे. याप्रसंगी माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या पत्रात आ.चौगुले यांनी म्हणले आहे कि, प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारा मराठा समाज शेतीचे झालेले विभाजन व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे. मागील अनेक वर्षापासून मराठा समाजातील बांधव हे आरक्षणाची मागणी करत आहेत. यामुळे मागील काळात महाराष्ट्रात सबंध मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अतिशय शांततेत लाखोंचे मोर्चेही निघाले. त्या सर्व मोर्चामध्ये आपण समन्वयाची भूमिका घेत होता हे आम्ही पाहिले आहे. मराठा समाज आपल्याकडे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आपण स्वतः या विषयाकडे जातीने लक्ष ठेवून आहात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका सुरुवातीपासून आहे. सध्या मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व गावागावाने साखळी आमरण उपोषण करण्यात येत आहे. समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा.
तसेच सकल मराठा समाजाला तात्काळ सर्व स्तरावर टिकेल असे आरक्षण देऊन महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व विभागातील नोकर भरतीमध्ये सामावून घ्यावे, तोपर्यंत नोकर भरती थांबवावी याचबरोबर सारथी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत-जास्त मराठा समाजातील मुलांना मिळवून द्यावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी रद्द करून मराठा समाजातील लाखो तरुणांना तरुणींना उद्योग किंवा व्यवसायासाठी तात्काळ व सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा मुला-मुलींना स्वतंत्र वस्तीगृह उपलब्ध करून द्यावेत, आदी मागण्याही आ.चौगुले यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.