इंदिरानगर तांडा येथे ‘आनंद घरा’चे मोठ्या उत्साहात उद्घाटन

लोहारा (जि.धाराशिव ) : ज्ञान प्रबोधनी संस्था, हराळीच्या माध्यमातून कोरोना काळात तांड्यावर एक तास अभ्यासिका स्वरूपात सुरू झालेल्या आनंद शाळा उपक्रमातून तांड्यांवर मोठे काम उभे राहत आहे. या प्रकल्पाचा भाग असलेले आनंदी शाळेचे ‘आनंद घर’ इंदिरानगर (ता-तुळजापूर, जि-उस्मानाबाद) येथील तांड्यावर उभे राहिले आहे. या आनंद घराचे गुरूवारी (दि.२१) प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला ज्ञानप्रबोधनी संस्थेचे केंद्र अभिजीत कापरे आणि हेमाताई होनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तुळजापूर तालुक्यातील इंदिरानगर येथील तांड्यावर कंटेनर स्कूल (आनंद घराचे) उद्घघाटन ज्ञान प्रबोधनी संस्था, हराळीचे प्रमुख अभिजीत कापरे, तांड्यातील ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाण, कॉन्ट्रॅक्टर संजय राठोड,वसंत राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आनंद शाळेचा भाग असलेले तांड्यावर विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सहभागी होते. या उद्धाटन कार्यक्रमासाठी तांड्यावरील विद्यार्थ्यांकडून विविध सांसस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
इंदिरानगर (ता. तुळजापूर) येथील तांड्यावर कंटेनर स्कूलच्या उद्धाटनप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात तांड्यावरील विद्यार्थी ही सादरीकरणासाठी नटून थटून आली होती. दरम्यान विद्यार्थ्यांनी इंग्रजी गीते सादर केली, तसेच काही मुलींनी पारंपरिक वेषभूषेत नृत्य देखील सादर केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करणारा होता. या प्रसंगी तांड्यावरील काही मुलांनी मनोगते व्यक्त केली त्यामध्ये मुलांना आनंद शाळा खूपच आवडत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान आनंद शाळा प्रकल्पातील समन्वयकांनी मुले ‘आनंद शाळेत कशा पद्धतीने शिकतात, आनंद शाळेत काय काय शिकवले जाते’ याविषयीही माहिती दिली तेव्हा, पालकांनी यापुढेही आनंद शाळा अशीच सुरू ठेवावी असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य व पालक यांनी आमच्या मुलांची शैक्षणिक सोय केली म्हणून ज्ञान प्रबोधनी संस्थेचे आभार मानले व यापुढे आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासनही इंदिरानगर येथील नागरिकांनी दिले. या कार्यक्रमासाठी तांड्यातील विद्यार्थी, तरुण आणि माता-पालक अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांड्यावरील ‘आनंद शाळा’ प्रकल्पाविषयी
ज्ञानप्रबोधिनी हराळीमार्फत सुरू करण्यात आलेली ‘आनंद शाळा’ यावर्षी चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. कोरोना काळापासून ते आजपर्यंतचा आनंद शाळेचा प्रवास पाहता मुलांची आनंद शाळेविषयीची गोडी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर आणि लोहार तालुक्यातील एकूण १३ ठिकाणी आनंद शाळा भरवली जाते. ज्या ठिकाणी आनंद शाळा उघड्यावर होत होती त्या ठिकाणी आता निवाऱ्याची सोय झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या ताड्यांवर चार ठिकाणी आनंदघराची निर्मिती देखील झाली आहे. या प्रकल्पासाठी 23 जणांची टीम सध्या कार्यरत आहे. तसेच वेळोवेळी तांड्यांवरील लोकांचे देखील मोलाचे सहकार्य या प्रकल्पासाठी लाभत आहे. आनंद शाळेच्या माध्यमातून तांड्यातील शैक्षणिक वातावरण समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही प्रकल्पाचे प्रमुख सुरज रसाळ यांनी स्पष्ट केले आहे. सूत्रसंचालन विकास चव्हाण यांनी केले व आभार बालाजी राठोड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!