आजघडीला विमा कंपनीने शेतकऱ्यांना ५३६ कोटी रुपये वितरित करावेत – आ. ज्ञानराज चौगुले

उस्मानाबाद : प्रधानमंत्री पीक विमा खरीप २०२० अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्या वतीने आज मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
यावेळी खरीप हंगाम २०२० संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने विमा कंपनीकडून प्राप्त पहिल्या यादीमध्ये नुकसान भरपाई हि केवळ ३३ % प्रमाणे असल्यामुळे ती मान्य नसून शेतकऱ्यांचे NDRF मधील फक्त २ हेक्टर क्षेत्र ग्राह्य न धरता विमा संरक्षित आहे. तेवढे सर्व क्षेत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार आजघडीला विमा कंपनीने शेतकऱ्यांना ५३६ कोटी रुपये वितरित करावेत अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली.
काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन २९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली एक आठवड्याची मुदत ६ ऑक्टोबरलाच संपली असून कंपनीने जर तात्काळ शेतकऱ्यांना पैसे नाही दिल्यास कंपनीच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा ही आमदार चौगुले यांनी दिला.
तसेच जिल्हाधिकारी यांनीही विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात-लवकर कार्यवाही न केल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सूचना केल्या आहेत. या बैठकीस विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री.आशिष शर्मा, कृषी विभागाचे अजिंक्य पाटील, व इतर याचिकाकर्ते उपस्थित होते.