राज्यपाल कोश्यारी, मंत्री पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन

उस्मानाबद : महापुरूषांविषय बेताल वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी (ता.१३) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून भाजपचे लोकप्रतिनिधी व संवैधानिक पदावर विराजमान असलेल्या लोकांकडून महापुरुषांचा सातत्याने अवमान केला जात आहे. परिणामी जनमानसांच्या भावना दुखावल्या जात आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या वाचाळविरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी करीत रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते चतुर्वेदी, प्रसाद लाड याच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अवमान करणाऱ्या संबंधितांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, भिमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी रिपाइं रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, संभाजी ब्रिगेडच्या रंजना हसुरे, तिम्मा माने, रवी पवार, बालाजी माटे, बालाजी चव्हाण, किरण कांबळे, कल्लाप्पा दुपारगुडे, अमर महालिंगे, दीपक रोडगे, महादेव वाघमारे, संघर्ष सोनवणे, वैजनाथ जट्टे, शंकर दंडगुले, ज्ञानेश्वर भालेराव, आम्रपाली गोतसुरवे, सुमान कोळी, सुवर्णा भंडारे, लक्ष्मी भंडारे, तेजस्वी लांडगे आदी उपस्थित होते.