लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा मिळवणे हे मुख्य ध्येय – आर. एस. देशिंगे

पुणे येथे अखिल भारतीय लिंगायत धर्म परिषद संपन्न
पिंपरी : ( प्रतिनिधी )
या देशामध्ये आणि जगामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या मुळे लोकशाही माहीत झाली.सर्वांनी समानतेने, एकमेकांच्या सहयोगाने, सन्मानाने जीवन जगावे ही चालरीत, परंपरा महात्मा बसवण्णानी सुरू केली. आपण सर्वजण त्यांचे अनुयायी आहोत. महात्मा बसवण्णानी स्थापन केलेला लिंगायत धर्म केंद्र शासनाच्या संविधानिक नोंदीवर येण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती जबाबदारी पार पाडूया.लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्यांक दर्जा मिळवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे असे प्रतिपादन लिंगायत धर्म महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आर. एस. देशिंगे यांनी केले.
अखिल भारतीय लिंगायत धर्म परिषद देशभरातील विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये आकुर्डी येथे संपन्न झाली. यावेळी देशींगे बोलत होते.लिंगायत धर्म महासभा महाराष्ट्र राज्यच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी लिंगायत धर्म महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आर. एस. देशिंगे होते.महिला राज्य अध्यक्षा वैशाली दिलीप पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले.
परीषदेस प्रमुख अतिथी म्हणून जागतिक लिंगायत महासभा बेंगळूरूचे राष्ट्रीय सरचिटणीस जी. बी. पाटील, कलबुर्गी चे निवृत्त डी एस पी आर. सी. घाळे, राष्ट्रीय बसव दल तेलंगणा राज्य अध्यक्ष शंकराप्पा पाटील, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, लिंगायत धर्म महासभेचे राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील, महिला राज्य सरचिटणीस रश्मी अशोक चौगुले, पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ जानते, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली संजय पाटील आदीसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश येथील निमंत्रित प्रतिनिधी सहभागी झाले होते.
लिंगायत धर्माला केंद्र शासनाकडून संविधानिक मान्यता मिळावी आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या हेतू सध्यासाठी या परिषदेचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने या परिषदेत महत्त्वाचे दोन ठराव आणि एक जाहीर आवाहन करण्यात आले.
परिषदेत ‘ लिंगायत समुदायास अल्पसंख्यांक दर्जा मिळण्यासाठी लिंगायत धर्माची संविधानिक नोंद व्हावी ‘ या कामी आयोग नेमण्याची मागणी करणेबाबत व ‘ लिंगायत धर्म आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवन्ना ‘ हा विचार घेऊन कार्य करणारी संघटना लिंगायत धर्मीयांची प्रतिनिधीक संघटना समजावी या दोन विषयाचे ठराव मंजूर करण्यात आले. तसेच केंद्र शासन दरबारी कार्य चालवण्यासाठी अखिल भारतीय अभ्यास समिती जाहीर केली असून अजून कोणाला या अभ्यास समितीवर कार्य करायचे असेल तर त्यांनी संपर्क साधण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले.
लिंगायत धर्म महासभेचे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल बापू कोठावळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंपळे यांनी अनुक्रमे ठराव मांडले. महिला कार्यकारीनी सदस्या सारिका संजय मगदूम आणि सांगली महिला जिल्हाध्यक्षा श्रीदेवी संजय कबाडे यांनी अनुमोदन दिले. तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्या सविता पाटील यांनी जाहीर आवाहन सादर केले.
प्रमुख अतिथी पाटील म्हणाले की,आज या ठिकाणी अखिल भारतीय लिंगायत धर्म परिषद संपन्न होत आहे हे खूप आनंदाचे आणि महत्त्वाचे कार्य आहे. लिंगायत हा धर्म आहे हे सिद्ध आहे. आणखी कोणी याचे सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. ज्या धर्तीवर जैन, बौद्ध, शीख हे धर्म शासनाच्या नोंदीवर आहेत त्या अटींना पात्र राहून लिंगायत धर्म शासनाच्या नोंदीवर येऊ शकतो. मात्र आतापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले होते. याविषयी यापूर्वीसुद्धा काही प्रयत्न झाले आहेत मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हे आपले कार्य पूर्ण झाले नव्हते. मात्र इथून पुढील काळात असे परिषद आणि परिषदेच्या निमित्ताने तयार होणारी कागदपत्रे, लिंगायत समाजाची भूमिका, लिंगायत समाज बांधवांचे संघटन यामुळे केंद्र सरकारला आपली मागणी मागणी करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने इथून पुढील काळात या ठिकाणी ज्या ज्या राज्यातील प्रतिनिधी उपस्थित आहेत त्या सर्वांनी सक्रिय व्हावे असे आवाहन केले. अविनाश भोसीकर, आर. सी. घाळे, शंकराप्पा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
उद्घाटनपर भाषणात वैशाली पाटील म्हणाल्या की, हजारो वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थिती असताना महिलांना, शूद्रांना, सन्मान देण्याचे कार्य महात्मा बसवांनानी केले आहे.त्यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म केंद्र शासनाच्या संविधानिक नोंदीवर घेणे हे केंद्र शासनाचे कर्तव्य आहे. या कार्यात हवी ती जबाबदारी आम्ही पार पाडूया आणि केंद्र शासन दरबारी यश घेऊया. हे यश मिळवण्यासाठी पुढील नियोजनासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे.इथून पुढे प्रत्येकानी आपली जबाबदारी घेऊन कार्य करूया आणि शासन दरबारी यश घेऊया.
स्वागत वाळवा महिला तालुकाध्यक्षा डॉ. मीनाक्षी अंकुश जंगम यांनी केले. प्रस्ताविक परिषदेचे संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. संजय पाटील यांनी केले. आभार संयोजन समिती सदस्य दिलीप देशमुख सरकार यांनी मानले. मुंबई महिला जिल्हाध्यक्षा अमृता सागर मळली यांनी सूत्रसंचालन केले.