लोहारा, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र शासनाच्या “एक पेड़ माँ के नाम” अभियानाच्या प्रेरणेतून लोहारा तालुक्यातील अचलेर येथे भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अमृतराव पाटील यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी राजेंद्र पाटील यांनी मातृऋण आणि निसर्गऋण फेडण्याच्या दिशेने वृक्षारोपण हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि घटणारे हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “एक पेड़ माँ के नाम” या अभियानामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
हरित, स्वच्छ आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन वृक्षारोपण करावे आणि लावलेल्या वृक्षांचे जतन करावे, असे आवाहनही राजेंद्र पाटील यांनी यावेळी केले.