लोहारा (प्रतिनिधी) : लोहारा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, मजूर, नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोहारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद पाटील हे सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. .
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, रोजगार हमीची कामे वाढवून तात्काळ मंजूर करावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार असल्याचे दयानंद पाटील यांनी सांगितले.