लोहारा प्रतिनिधी : कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा येथील स्वामी रामानंद तीर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था व न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवराज्याभिषेक दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. सविता जाधव या होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शहाजी जाधव व आर. एस. पुजारी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य शहाजी जाधव म्हणाले की, “आजही ३५० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो, कारण ते केवळ भूभाग जिंकणारे राजे नव्हते, तर भूमी, निसर्ग आणि मानवतेचे संरक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराज हेच पंच परिवर्तनाचे आद्य निर्मितीकार होते.”
ते पुढे म्हणाले की, महाराजांनी आपल्या स्वराज्यात पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य, स्वबोध, समरसता आणि कुटुंब प्रबोधन या पंच परिवर्तनाचा अवलंब केला होता.
सैनिकांना हिरवी झाडे न तोडण्याच्या सूचना देऊन वृक्षसंवर्धन आणि जलव्यवस्थापनावर त्यांनी भर दिला. रयतेच्या हिताचे रक्षण करताना शेतकऱ्यांच्या पिकातून सैन्य वा घोडदळ जाऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले होते.
स्त्रियांच्या सन्मानाबाबतही महाराज अत्यंत कठोर होते. अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात होती. स्वाभिमान, संस्कृती आणि स्वदेशीचा अभिमान बाळगणे म्हणजे स्वबोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अठरापगड जातींना एकत्रित घेऊन महाराजांनी समरसतेवर आधारित स्वराज्य निर्माण केले होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास ए. बी. भोसले, के. के. पांचाळ, व्ही. व्ही. बाळकुंदे, ए. एस. डोंगरे, आय. एफ. शेख, कुमार यादव, सोनाली काटे, वैशाली गोरे, दिपिका देशमुख, मीरा माने, सुलक्षणा जाधव, अर्चना सोनके, सुलोचना वकिल, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.